परळी वैद्यनाथ, प्रतिनिधी – राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या परळी वैद्यनाथ नगर परिषद निवडणुकीत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या अभेद्य नेतृत्वाखालील ‘महायुती’ने विजयाचा तुतारी फुंकली आहे! उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणीच विरोधकांचे मनोधैर्य खचले, कारण, दोन जागांवर महायुतीचा ‘बिनविरोध’ विजय झाला आहे. हा तर फक्त ट्रेलर आहे!
पहिला दणका: विरोधकांची शरणागती
मुंडे बंधू-भगिनींच्या एकजुटीपुढे टिकाव न लागल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेश्मा केशव बळवंत (प्रभाग १३- ब) आणि शिवसेना (शिंदे गट) च्या उमेदवार जयश्री मुंडे – गित्ते (प्रभाग ११ – अ) यांनी बिनविरोध नगरसेवक होण्याचा मान पटकावला आहे.
मुंडे बंधू-भगिनी ‘महायुती’ म्हणून मैदानात उतरल्याने त्यांचे बळ प्रचंड वाढले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीआधीच दोन जागा खिशात टाकल्याने ‘मुंडेंचा गड’ अभेद्य राहील, याबद्दल आता कोणालाही शंका नाही. विरोधकांनी आतापासूनच आपले पत्ते टाकायला सुरुवात केली आहे, हे स्पष्ट दिसते!
‘सोशल इंजिनिअरिंग’चा अचूक फॉर्म्युला
या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी केवळ पक्षीय गणिते पाहिली नाहीत, तर अत्यंत कुशलतेने ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग साधला आहे. त्याला मंत्री पंकजाताई मुंडे यांची भक्कम साथ आणि शिवसेनेचे बळ मिळाल्याने, ‘महायुती इफेक्ट’ परळीत निर्णायक ठरणार आहे.
राज्यात अनेक ठिकाणी महायुतीची समीकरणे बिघडलेली असताना, धनंजय मुंडे यांच्या धडाकेबाज पुढाकारामुळे परळी नगर परिषद निवडणुकीत महायुती पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस २३ जागांवर लढत आहे. तसेच, भाजप ८, शिवसेना २ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनाही दोन जागा देऊन, मुंडे यांनी महायुतीची घडी अशी बसवली आहे की, विरोधकांना माघार घेणे भाग पडेल!