बीड जिल्ह्यातील नियोजन समितीच्या बैठकीसाठी येत असताना पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील राजकीय नियोजनाला सुरुवात केली आहे. बीड जिल्हा नियोजन समितीच्या विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन सदस्यांमधून राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित तर भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन सदस्य समितीमधून सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना वगळण्यात आले आहे. हा सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे हितसंबंध असल्याचा आरोप सुरेश धस आणि प्रकाश सोळंके सातत्याने करत होते. या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळेच अजित पवार या दोन्ही विरोधकांना धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यात महायुती सरकार आल्यानंतर राज्यातील सर्वच नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नियोजन समित्यांवर केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी हेच राहिले होते. आता बीड जिल्हा नियोजन समितीवर विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन जागांवर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, केजच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे आणि बीड जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील निर्णय हा भाजप आणि राष्ट्रवादीच्या जुन्या विधानमंडळ सदस्यांना धक्का मानला जात आहे. या निर्णयाचे महायुतीत काही पडसाद उमटणार का, हे बघावे लागेल.
दरम्यान, अजित पवार हे गुरुवारी सकाळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये दाखल झाले. यावेळी परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी, खंडणीखोरी खपवून घेतली जाणार नाही, असा रोखठोक इशारा दिला. जे लोक चुकीचे काम करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सातत्याने गुन्हे करणाऱ्यांना मकोका लावला जाईल. तसेच रिव्हॉल्व्हर दाखवून रील तयार करणाऱ्यांचे लायसन्स रद्द केले जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.