बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वातावरण तापलं
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला वीस दिवस झाले असूनही, काही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. वाल्मिकी कराड यांच्या अटकेची मागणी जोर धरत आहे. आमदार सुरेश धस या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत आहेत. शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्यात वाल्मिकी कराड यांना अटक करावी आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबोल
ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणात उडी घेत सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सदावर्ते म्हणाले, “धस नावाचे आमदार आहेत त्यांचा मला निषेध करायचा आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचे राजकारण किती करायचे याला मर्यादा असतात. व्यक्तिगत राजकारणासाठी तुम्ही तो मोर्चा काढला होता, परंतु तो शिमगा वाटत होता. मोर्चात टाळ्या शिट्ट्या वाजत होत्या तो दुखवटा होता की काय होता? दुःख आणि दुखवटा कशाला म्हणतात ते एसटीतल्या कर्मचाऱ्यांकडून शिका.”
सदावर्ते पुढे म्हणाले, “वाल्मिकी कराड साहेबांना अटक करा असं तुम्ही म्हणताय पण ते वाल्मिकी कराड साहेब आतापर्यंत कुठल्या एफआयआरमध्ये आहेत का? आधी फाशी आणि नंतर चौकशी असा कायदा आहे का जगात? धनंजय मुंडे वंजारी आहेत म्हणून टार्गेट करत आहात का? कालच्या मोर्चात काही म्होरके सोडले तर कोणी सुद्धा नव्हतं. कालचा मोर्चा असंवैधानिक होता. वाल्मिकी कराड साहेब मर्डरमध्ये आरोपीच नाहीत तर मग त्यांना नोटीस तरी देता येईल का? अटक करण्यासाठी पुरावे लागतात.”
सदावर्ते यांनी सुरेश धस यांचे कार्यकर्ते धमक्या देत असल्याचा आरोप केला आहे. “सुरेश धस यांचे कार्यकर्ते मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. हे अत्यंत वेदनादायी आहे,” असं सदावर्ते म्हणाले.