नागपूर : केंद्र सरकारनं केलेल्या नव्या कृषी कायद्याची माहिती देण्यासाठी फडणवीस यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना काही राजकीय प्रश्नही विचारले. ‘राज्यातील काही वरिष्ठ पोलीस अधिकारी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या प्रयत्नात होते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला गेला. शरद पवारांनी यात हस्तक्षेप केला होता,’ असं वृत्त गृहमंत्री देशमुख यांच्या हवाल्यानं नुकतंच प्रसिद्ध झालं होतं. देशमुख यांनी तात्काळ ते फेटाळून लावलं. माझ्या तोंडी हे वक्तव्य टाकून बातमी देण्यात आली, असं त्यांनी म्हटलं होतं.
फडणवीसांना याबाबत विचारलं असता त्यांनी देशमुखांसह ठाकरे सरकारवरही टीका केली. ‘महाराष्ट्रातल्या कुठल्याही गृहमंत्र्यानं आपल्या पोलिसांवर इतका अविश्वास दाखवला नाही. आम्ही सत्तेत आलो तेव्हाही आधीचेच पोलीस होते. आम्ही त्याच पोलिसांना सोबत घेऊन उत्तम काम केलं. सरकार जे सांगतं त्यानुसार पोलिसांना काम करावं लागतं. काही ठिकाणी त्यांना त्यांचे म्हणून विशेष अधिकार आहेत,’ असं फडणवीस म्हणाले. ‘देशमुख यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलंय. त्यांना संशयाचा फायदा देऊ. पण त्यांच्या बोलण्याचा असा काही अर्थ निघणंही बरोबर नाही. स्वत: अविश्वास दाखवायचा आणि दुसऱ्यानं काही म्हटलं की महाराष्ट्राचा अपमान झाला असं म्हणायचं हे योग्य नाही,’ असा टोलाही त्यांनी हाणला.