मुंबई: राज्यात आज ४७४ करोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा ३० हजार ८८३ इतका झाला असून राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.७५ टक्के इतका आहे. मंगळवारी २० हजारावर करोना बाधितांची नोंद झाल्यानंतर आज तब्बल २३ हजार ३६५ नवीन रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या ११ लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात करोनाने थैमान घातले आहेत. लॉकडाऊन काळात राज्यात करोनावर काही प्रमाणात नियंत्रण राखण्यात आरोग्य यंत्रणांना यश आलं होतं. मात्र राज्यात निर्बंध हळूहळू शिथील होऊ लागल्यानंतर करोनाचा स्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. दर आठवड्याला नव्याने लाखभर रुग्णांची भर पडू लागली आहे. सप्टेंबर महिन्यात तर मोजक्याच दिवसांचा अपवाद सोडला तर दररोज २० हजारावर नवे करोना बाधित रुग्णालयात दाखल होत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांच्यावर असले तरी नवीन रुग्णांचा आकडा कमी होत नसल्याने आरोग्य यंत्रणा व सरकारपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.