सोलापूर | केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर अचानक बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. अशातच कंगणाला भेटणारे राज्यपाल, कांदयासाठी शेतकरी पुत्रांना भेटणार का?, असा सवाल शेतकरीपुत्राने केला आहे. यासंदर्भात किसानपुत्र विरेश आंधळकरने राज्यपालांना पत्र पाठवलं आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे मीच नाही तर शेतकऱ्यांची शहरामध्ये काम करणारी शिकणारी मुले गावाकडे परतली आहेत. महामारीमुळे गावी परतल्यामुळे वडिलोपार्जित शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांनी काम करून उत्पन्न काढण्यासाठी जीवाचे रान केलं आहे. जास्त पावसामुळे रोपांवर रोग पडले 3 ते 4 हजार रुपये किलोने घेतलेले कांदा बियाणे यामुळे खराब झाले. त्यातून काही वाचलेल्या रोपांची लागण केली तर आता केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी लादली त्यामुळे कांदा भाव गडगडणार यात शंका नाही, असं विरेश आंधळकरने म्हटलं आहे.
आपण संपूर्ण राज्याचा आधार आहात. आजवर अनेक राजकारणी, सिनेकलाकारांनी आपली भेट घेतल्यानंतर त्यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. वरील सर्व परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी आपली भेट मिळणं अत्यंत गरजेचं आहे. तरी कृपया इतरांप्रमाणे आपण आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना देखील भेटण्यास वेळ द्यावा ही हात जोडून विनंती, असं विरेशने पत्रात नमुद केलं आहे.
दरम्यान, राज्यातील वेगवेगळ्या पक्षातील नेते, अभिनेत्री कंगना राणावत तसेच इतर बड्या व्यक्तींना वेळ देणारे राज्यपाल कष्टकरी शेतकऱ्याच्या पुत्रांना भेटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.