पवारांनी टोचले नातवाचे कान; अजितदादा ‘सिल्व्हर ओक’वर पोहचल्याने चर्चांना उधाण

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज प्रथमच प्रतिक्रिया दिली. याप्रकरणी सुरू असलेल्या तपासावर पवार बोललेच पण त्याचवेळी त्यांनी नातू पार्थ पवार यांचेही कान पकडल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आजोबांच्या तीव्र प्रतिक्रियेवर पार्थ यांनी काहीही बोलण्यास नकार दिला असला तरी पवार कुटुंबात मात्र बऱ्याच हालचालींना वेग आला आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. याबाबत आज शरद पवार यांना विचारले असता त्यांनी पार्थ यांचा चांगलाच समाचार घेतला. पार्थ अपरिपक्व आहे. त्याचा अनुभव तोकडा आहे. त्याच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही, अशा शब्दांत पवार यांनी पार्थ यांना फटकारले. पवार यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. सुशांत प्रकरणी शरद पवार यांनी नातवाला उघडपणे फटकारल्याने विरोधी पक्ष भाजपसाठी आयते कोलीत सापडले. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार तातडीने शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील तिथे पोहचले असून या बैठकीत नेमकी कोणती चर्चा होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हे वाचा – पार्थ पवार इममॅच्युअर त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार

पार्थ पवार का आहेत चर्चेत?

> पार्थ पवार गेले काही दिवस चर्चेत आहेत. ते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राज्यातील महाविकास आघाडीच्या अजेंड्याशी विसंगत भूमिका घेत असल्याने चुकीचा संदेश जात असल्याचे काही नेत्यांचे म्हणणे आहे.

> राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत शरद पवार यांनी एक विधान केले होते. राम मंदिराच्या भूमिपूजनाने करोना संपणार आहे का?, असा तीरकस सवाल पवार यांनी केला होता. त्यावर बरंच वादळ उठलं. पवारांवर भाजपकडून चौफेर टीका झाली. या साऱ्या गदारोळात पार्थ पवार यांनी ‘जय श्रीराम’ म्हणत मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला जाहीरपणे सदिच्छा दिल्या होत्या.

> सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. हा तपास सीबीआयकडे द्यावा अशी भाजपची मागणी असून बिहारमधील नितीशकुमार सरकारने तशी शिफारस केंद्राकडे केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारसाठी हा विषय प्रतिष्ठेचा बनला आहे. अशावेळी पार्थ यांनी विसंगत भूमिका घेत याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली व त्याची देशभर चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!