बीडमध्ये पुन्हा तणाव: लक्ष्मण हाकेंवरील हल्ल्यानंतर वाढती चिंता

बीडमध्ये पुन्हा तणाव: लक्ष्मण हाकेंवरील हल्ल्यानंतर वाढती चिंता
गेल्या काही वर्षांपासून शांत असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर, “बीड पुन्हा पेटत आहे का?” असा प्रश्न जनसामान्यांच्या मनात उभा राहिला आहे. हाके यांच्यावर झालेला हल्ला आणि यापूर्वी झालेल्या जाळपोळीसारख्या घटनांसाठी कोण जबाबदार आहे, याचा शोध घेणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराईत सुरु असलेला जमाव पांगवण्याचा आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे. लक्ष्मण हाके छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. यावेळी दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन लक्ष्मण हाके यांनी विजयसिंह पंडित यांना आव्हान दिलं होतं.  विजयसिंह पंडित यांचे मनोज जरांगे यांना समर्थन देणारे बॅनर लागले होते. त्यावरुन वाद झाला होता. लक्ष्मण हाके यांच्या गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला. या वादात चप्पल भिरकवण्यात आली, दगडफेक करण्यात आली, दंडुक्याची भाषा वापरण्यात आली. यानंतर या ठिकाणावरील परिस्थिती चिघळली होती. पोलिसांनी त्या ठिकाणावरुन लक्ष्मण हाके यांना बाहेर काढून बीडच्या दिशेनं रवाना केलं. या राड्यात लक्ष्मण हाकेंना देखील मारहाणीचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते या चौकात दोन्ही बाजूला थांबलेले दिसून येत आहेत. या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. गेवराई शहरात दोन्ही गट आक्रमक झालेले होते



लक्ष्मण हाके यांच्यापासून कोणाला भीती?
हाके यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे एक प्रश्न समोर येत आहे की, **लक्ष्मण हाके यांच्यापासून कोणाला इतकी भीती वाटत आहे?** त्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या भूमिकेमुळे आणि वक्तव्यांमुळे समाजात एक गट त्यांच्या विरोधात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, हा विरोध एवढ्या टोकाला जाऊन हिंसाचाराचे रूप घेत आहे, हे चिंताजनक आहे.



३० ऑक्टोबर २०२३ ची पुनरावृत्ती?
३० ऑक्टोबर २०२३ रोजी बीडमध्ये अशाच प्रकारे आरक्षणावरून वाद निर्माण झाला होता आणि ठिणगी पडली होती. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात हिंसा आणि जाळपोळ झाली होती. आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे बीड पोलीस या प्रकरणांमध्ये सक्षम आहेत का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि संवेदनशील परिस्थिती हाताळण्याच्या त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!