सुरेश धसांविरोधात भीम आर्मी आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांकडे ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी




परभणीतील हिंसाचारानंतर (Parbhani Violence) सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ परभणी ते मुंबईपर्यंत लॉन्ग मार्च आयोजित करण्यात आला होता. भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) यांच्या मध्यस्थीनंतर हा लॉन्ग मार्च नाशिक (Nashik) येथे स्थगित करण्यात आला. मात्र, सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सुरेश धस यांनी म्हटले होते की, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाही.

या वक्तव्यानंतर विरोधकांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. भीम आर्मीने सुरेश धस यांच्यावर तात्काळ ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भीम आर्मी आक्रमक झाली असून, या संदर्भात भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

अशोक कांबळे यांनी म्हटले की, भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी म्हटले की, सोमनाथ सूर्यवंशी यांना ज्या पोलिसांनी मारले, त्यांना माफी द्या आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नका. या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सुरेश धस यांच्यावर तात्काळ ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी करतो.

या आमदाराने आमचा लॉन्ग मार्च चिरडण्याचे काम केले आहे. या प्रकारामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सुरेश धस यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे.

error: Content is protected !!