कडा – चोरट्यांनी घरात प्रवेश करून शेतकऱ्याच्या गळ्याला चाकू लावून दीड लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना आष्टी तालुक्यातील शेकडे वस्तीवर रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील महिंदा येथील शेकडे वस्तीवर शेतकरी मोहन शेकडे कुटुंबासह राहतात. शनिवारी रात्री जेवण करून शेकडे कुटुंब घरात झोपले होते. रविवारी पहाटे २ च्या दरम्यान चार चोरट्यांनी घराची कडी उघडून प्रवेश केला. यावेळी शेकडे जागे झाले असता, चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला चाकू लावला व तोंड दाबून धरले. इतर चोरट्यांनी घरात शोधाशोध करत पत्र्याची पेटी ताब्यात घेतली. एका चोराने वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोने तोडले, मात्र शेकडे कुटुंबीयांनी आरडाओरड केली असता चोरटे पेटी घेऊन पळाले.
शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. पेटी अर्धा किलोमीटर अंतरावर सापडली असून त्यातील दीड लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. ही रक्कम शेती विक्री आणि शेळी-म्हैस विक्रीतून मिळाली होती.
माहिती मिळताच घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे, अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परशूराम मंजुळे यांनी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी तपास केला. मोहन शंकर शेकडे यांच्या फिर्यादीवरून अंमळनेर पोलीस ठाण्यात चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण करीत आहेत.