बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हत्या आणि गोळीबाराच्या घटनांनी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बीड शहरात जुन्या भांडणाची कुरापत काढून एका व्यक्तीवर घरात घुसून गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, गोळीबार करणाऱ्या आठवले गँगच्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात अटक केली आहे.
अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर, आणि ओंकार सवाई अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ओंकारला बीडमधून तर अक्षय आठवले आणि मनीष क्षीरसागरला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात मनीष क्षीरसागर आणि अक्षय आठवलेवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपींना पुण्यातून अटक केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मुरकुटे, मुन्ना वाघ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ही मोठी कारवाई केली आहे. आज या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
या कारवाईमुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये काहीसा दिलासा मिळाला आहे.