संतोष देशमुख हत्या: भाऊ धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया
बीड, दि. १६ (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेवर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “माझ्या भावाच्या हत्या प्रकरणाला जातीय वळण देऊ नका, राजकारण करू नका. जे या प्रकरणाला जातीवादाचा रंग देत आहेत तेच खरे जातीयवादी आहेत. या प्रकरणात जातीवादाचा काहीच विषय नाही. ज्या जातीचा मुख्य आरोपी आहे त्या जातीचे कुटुंब गेल्या २२ वर्षांपासून माझी शेती पाहत आहेत.”
धनंजय देशमुख यांनी पुढे म्हटले की, “जे मंत्री आहेत ते आता कुठल्या जातीचे नाहीत, त्यामुळे माझ्या भावावर जो अन्याय झाला आहे त्या प्रकरणात ते सभागृहात आवाज उठवतील आणि माझ्या भावाला न्याय मिळवून देतील.”
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जातीयवादाचा आरोप केला जात आहे. परंतु, धनंजय देशमुख यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले की, “संतोष देशमुख यांची जातीयवादातून हत्या झालेली नाही. मी आतापर्यंत २२ वर्षांत जे माझ्या घरात अन्न खातोय ते वंजारी समाजाचे शेतकरी पिकवत आहेत. जातीयवादाचा विषय असता तर त्यांचे आणि आमचे नाते एवढे वर्ष टिकले नसते. या गोष्टीची शहानिशा केली तर हा जातीयवादाचा मुद्दा नाही, हे कळेल.”
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सीआयडीचे पथक बीडमध्ये तळ ठोकून आहे. सीआयडीचे अधिकारी सचिन पाटील यांनी सोमवारी मस्साजोग येथे भेट दिली आणि देशमुख कुटुंबीयांशी चर्चा केली.
धनंजय देशमुख यांनी पुढे म्हटले की, “दलित, मुस्लीम, वंजारी बांधव येऊन गेले. येथे जातीवादाचा मुद्दा नाही. ही असुरी प्रवृत्ती आहे. समाजात विचारांचा दर्जा खालावला आहे. या प्रकरणाला जातीयवादाचं स्वरुप देऊ नका.”
दरम्यान, बीड जिल्ह्यातील दोन आमदारांना मंत्रिपदे मिळाली आहेत. जिल्ह्यात दोन मंत्री असल्याने या प्रकरणी न्याय मिळण्याकरता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, असाही प्रश्न धनंजय देशमुख यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “ते काय न्याय देतात हे पाहू. ते काय मुद्दे मांडतात हे पाहूया.”