संतोष देशमुख हत्याकांडाचा वाल्मिक कराड मास्टरमाइंड: संदीप क्षीरसागर

बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना: संदीप क्षीरसागर यांची तीव्र नाराजी

बीड जिल्ह्यात माजलगाव येथील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या घटनेवर संदीप क्षीरसागर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, अतिशय दुर्दैवी घटना आमच्या बीड जिल्ह्यात घडली आहे.

संदीप क्षीरसागर म्हणाले, “अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. सर्व महाराष्ट्र या घटनेचा साक्षीदार आहे. मी त्या कुटुंबाला भेटायला गेल्यानंतर त्या गावामध्ये गेल्यानंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी बोललो तसेच पूर्ण परिसरातील लोकांशी बोललो. अतिशय दहशतीचे वातावरण या गावात आहे. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जे काही गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामधले काही गुन्हेगारांना तर अटकच झालेली नाही. ज्यांना अटक झाली ते काही प्रमुख गुन्हेगार नाहीत. यांचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे आणि सगळ्यात प्रमुख त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. म्हणजे तपासची अशी दिशाभूल केली जात आहे.”

पुढे बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले, “खंडणीचा गुन्हा ज्यांनी दाखल केला, माझ्याकडे पुरावे आहेत की त्या पुरव्यांमध्ये ज्या विंडमिलच्या अधिकाऱ्यांनी जे खंडणीचे गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड यांचे सत्कार करतानाचे फोटो आहेत. माझी प्रमुख मागणी आहे की आज 8 ते 9 दिवस उलटले आहेत आणि पूर्ण जिल्हा हा संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी बघत आहे.”

रामकृष्ण बांगर यांच्याविषयी बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले, “रामकृष्ण बांगर एक शिक्षक संस्थानिक आहेत. त्यांच्या मुलावर कलम 307 दाखल करण्यात आले आहे. त्यांची सुद्धा जागा या वाल्मिक कराडला बळकवायची आहे म्हणून त्यांच्या मुलांवर 307 दाखल केला. त्यानंतर देखील ऐकले नाही म्हणल्यावर आई वडील आणि मुलगा यांच्यावर एट्रोसिटी दाखल करण्यात आला. मुलगा आणि त्याच्या आईकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत ज्यात दिसते की मुलगा इथे नाहीये. म्हणजे हे 307 दाखल करणे अशा पद्धतीचे काम इथे सुरू आहे.”

संदीप क्षीरसागर पुढे म्हणाले, “इतक्या निर्दयीपणे त्यांनी संतोष देशमुखला मारले आहे. अक्षरशः त्याचे डोळे फोडले आहेत आणि कॉल रेकॉर्ड जर तुम्ही तपासले तर पूर्णपणे ते अॅंगल त्या वाल्मिक कराडकडे जाईल. पण का ही सरकार न्याय देण्यासाठी मागे सरकत आहे हा प्रश्न आमच्या सर्वांना पडला आहे. जिल्ह्यातले लोक आमच्याकडे फार आशेने बघत आहेत. त्यांनी आम्हाला आमदार म्हणून निवडून दिले. आम्ही संतोष देशमुख आणि रामकृष्ण बांगर यांना न्याय भेटल्याशिवाय आम्ही राहणार नाही.”

error: Content is protected !!