- महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच मेगाभरती होणार आहे. सात हजारांहून अधिक पोलिसांची भरती लवकरच होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अहमदनगरमध्ये ही माहिती दिली.
महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच मेगाभरती होणार आहे. सात हजारांहून अधिक पोलिसांची भरती लवकरच होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अहमदनगरमध्ये ही माहिती दिली. गृहमंत्री पाटील यांनी नगरमध्ये पोलिसांची आढावा बैठक घेतली. पोलिसांच्या विविध कामांची माहिती घेतली. नव्याने आवश्यक असलेली यंत्रणा, पोलीस ठाण्यांच्या विभाजनाची गरज, आवश्यक संख्याबळ याची त्यांनी माहिती घेतली. नाशिक परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यावेळी उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा:-
नगर पोलिसांनी सुरू केलेल्या ई-टपाल सेवेची गृहमंत्री वळसे पाटील यांनी पाहणी केली. या योजनेचा त्यांच्या हस्ते औपचारिक प्रारंभ करण्यात आला. राज्यात प्रथमच हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय आणि सर्व पोलीस ठाण्यांतील पत्रव्यवहार एका संगणक प्रणालीच्या माध्यमातून जोडण्यात आला आहे. यामुळे टपालाचा प्रवास वाचतो आणि तातडीने निपटारा होता. याबद्दल पाटील यांनी गृहमंत्र्यांना माहिती दिली. गृहमंत्र्यांनी या योजनेचे कौतुक केले. नगरचा हा उपक्रम राज्यात राबवण्यात येईल, असेही वळसे पाटील म्हणाले.
त्यानंतर पोलीस भरतीसंबंधी गृहमंत्र्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यात सुरू असलेली पोलीस भरती आता अंतिम टप्प्यात आली आहे. यातून भरती झालेले ५,२०० उमेदवार लवकरच कामावर रूजू होणार आहेत. त्यांच्या बहुतांश चाचण्या पूर्ण झाल्या असून अंतिम टप्प्यातील प्रक्रिया बाकी आहे.
आगामी काळात ती पूर्ण केली जाईल. त्यानंतर पुन्हा ७,२०० पदांची भरती सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरीही मिळाली आहे. यामुळे पोलीस दलात नव्याने मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पोलीस दलाची कार्यक्षमता आणखी वाढण्यास मदत होणार आहे. सध्याची भरती संपली की नव्या भरतीची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे, असेही वळसे पाटील यांनी सांगितले. करोनानंतर होणारी ही मेगा पोलीस भरती ठरणार आहे.