….नाहीतर गंगेत तरंगणाऱ्या पापांचे मालक म्हणून समोर या- खा. संजय राऊत

मुंबई | आपण राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात वाहताना आणि तरंगताना पाहिला. यामुळे भारताचा भेसूर चेहरा जगासमोर आला. तरीही भाजपकडून कोरोना असो किंवा चक्रीवादळ प्रत्येक संकटाचे राजकारण सुरुच आहे, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सामनातील ‘रोखठोक’ या सदरातून केली यांनी केली.

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर या गोमूत्रामुळे कोरोनाची बाधा होत नाही, असे सांगतात. जगातील अनेक देशांमधील वृत्तपत्रांनी गोमुत्रावरून आपली चेष्टा केली आहे. गंगेत हजारो कोरोनाग्रस्तांचे मृतदेह सोडून दिले व त्यांच्यावर धड अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. त्यांच्यापर्यंत हा गोमूत्र संदेश गेला असता तर त्यांना गंगेत फेकून देण्याची वेळ आली नसती, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

प. बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत या संकटकाळातही राजकारण सुरूच आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी याही परिस्थितीत सांगितले की, आज निवडणुका घेतल्या तरी भाजपाला 400 जागा मिळतील. पण आधी गंगेतून वाहून आणलेले मृतदेह उचला, मग निवडणुकांचं बघू. लोकांचे जगण्याचे आणि मरण्याचेही वांधे झाले आहेत आणि हे महाशय म्हणतात, चारशे जागा जिंकू. देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण फाजिल आत्मविश्वासाचे फुगे उंच हवेत उडत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

लाटांवर लाटा येतच जातील व प्रत्येक लाटेने देश कोलमडून जाईल. या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आमच्या राज्यकर्त्यांकडे नाही. गंगा ही पापाच्या शुद्धीकरणासाठी होती. आज गंगेचा प्रवाह पाप लपवायला आणि धुवायला तयार नाही. राजकारणाच्या गुडघ्यातून मान बाहेर काढून या प्रश्नांकडे जे पाहतील त्यांनाच सभोवतालचे सत्य दिसेल, असं राऊत म्हणाले.

error: Content is protected !!