बीड | बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीने लवकरच त्यांच्या प्रेमासंबंधीची माहिती पुस्तक स्वरूपातून प्रकाशित करणार असल्याचे फेसबुक पोस्ट मधून सांगितले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे. आता पुन्हा करुणा मुंडे आणि धनजंय मुंडे यांच्या नात्यासंबंधीच्या चर्चेला उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला होता त्यावेळी स्वतः धनंजय मुंडे यांनी संबंधित महिलेच्या बहिणीसोबत आपण परस्पर संबंधात होतो असा खुलासा केला होता. एवढेच नाही तर या महिलेपासून आपल्याला दोन मुले असल्याचाही धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमधून खुलासा केला होता.
करुणा धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट-
“माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे,” असं सांगत करुणा धनंजय मुंडे यांनी सोबत फोटो शेअर केला आहे. यामध्ये एक प्रेमकथा लवकरच असा उल्लेख असून खाली आश्चर्यजनक प्रेमकथा असंही लिहिण्यात आलेलं दिसत आहे.
करुणा यांची बहिण रेणू शर्मा यांनी पुढाकार घेत धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. पण नंतर त्यांनी तक्रार मागे घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोवर कोणताही कारवाई न कऱण्याचा निर्णय घेतला होता. तक्रार मागे घेतल्यानंतर हा वाद शमला होता. पण आता करुणा मुंडे पुस्तकाच्या निमित्ताने अजून कोणत्या गोष्टी नव्याने समोर आणतात हे पहावं लागणार आहे.
तक्रार मागे घेतली
धनंडय मुंडे यांच्यावरील आरोपानंतर भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली होती. याशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याचाही यामध्ये समावेश होती. यानंतर रेणू शर्मा यांनी आपण माघार घेत असल्याचं ट्विट केलं होतं.
धनंजय मुडेंवर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?
रेणू शर्मा यांनी ट्विट करत आपण तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते असं म्हटलं होतं. “एक काम करा तुम्ही सर्वांनीच मिळून निर्णय घ्या. कोणतीही माहिती नसताना जे मला ओळखतात तेदेखील चुकीचे आरोप करत असतील तर सर्वांनी मिळून निर्णय घ्या. ज्याप्रमाणे तुम्हा सर्वांची इच्छा आहे मी माघार घेते,” असं रेणू शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
“जर मी चुकीची आहे तर हे लोक आतापर्यंत समोर का नाही आले? मी जरी मागे हटले तरी, कोणत्याही पक्षाचं नाव न घेताही मला खाली पाडण्यासाठी आणि आता हटवण्यासाठी इतक्या लोकांना एकत्र यावं लागलं आणि त्यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटी मुलगी लढत होती याचा अभिमान आहे. आता तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहा,” असंही तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.