लसीकरण लांबणीवर, राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारकडून या लसीकरण मोहिमेचा मोठा गाजावाजा केला जात आहे. सर्वांना लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर पडणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण केलं जाणार आहे, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र एवढ्या सगळ्या नागरिकांचं लसीकरण करण्यास 1 मे पासून एवढ्या लसी उपलब्ध होणार नाहीत. मे अखेरीपर्यंत लसी कदाचित मिळू शकतात. त्यावेळी लसीकरण सुरु होऊ शकतं, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्याला दिवसाला 8 लाख डोसची गरज आहे. मात्र सध्या राज्याला 1 लाख डोस मिळत आहेत. लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या तर येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करता येणे शक्य आहे. तेवढी सुविधा राज्यात उपलब्ध आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं.

error: Content is protected !!