बीड: नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीनंतर महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यात 11 रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचे मृतांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून हे मृत्यू ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने झाला असल्याचा आरोप आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयाने मात्र या आरोपाचा इन्कार केला आहे. रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या अभावामुळे झाला हे खरे नसल्याचे रुग्णालयाचे अधिष्टाता शिवाजी शुक्रे यांनी सांगितले आहे. (relatives allege that patients died due to lack of oxygen in ambajogai the hospital however refused)
नातेवाईकांच्या या आरोपमुळे अंबोजोगाईत खळबळ उडाली आहे. नाशिकमधील घटना आजच घडल्याने अंबाजोगाईत जर ऑक्सिजनची कमतरता वाढत गेली, तर आमच्या रुग्णांचे कसे होणार याची चिंता अंबाजोगाईतील रुग्णांच्या नातेवाईकांना सतावू लागली आहे. जर ऑक्सिजनची कमतरता होती तर रुग्णालय प्रशासनाने याबाबत आधीच खबरदारी का घेतली नाही, असे मत नागरिक व्यक्त करू लागले आहेत. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. या 11 रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झालेला नसल्याचे ते म्हणाले. सध्या आमच्याकडे रुग्णांसाठी लागणारा आवश्यक तो ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आरोप फेटाळला
21 एप्रिल 2021 रोजी रात्री 12 वाजेपासून ते आतापर्यंत स्वाराती रुग्णालयामध्ये कोरोनामुळे एकूण 11 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यामधील बहुतांश रुग्णांचे वय हे 60 पेक्षा जास्त आहे. काही रुग्णांचा मृत्यू हा भरती होतांना ऑक्सीजनचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. तसेच त्यांना दमा, उच्च रक्तदाब, हायपरटेंशन इत्यादी शारीरिक व्याधी असल्याचेही दिसून आलेले आहे. परंतू, समाजमाध्यमांमध्ये स्वाराती रुग्णालयामध्ये ऑक्सीजनचा पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झालेला आहे अशा बातम्या येत आहेत. रुग्णालयामध्ये ऑक्सीजनचा पुरवठा करण्याकामी लोखंडीसावरगाव, बीड, लातूर, औरंगाबाद, नांदेड व जालना याठिकाणाहून जम्बो सिलेंडरचा व लिक्वीड ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पाठपुरावा करण्यात येत आहे. व सध्या रुग्णांसाठी आवश्यक तो ऑक्सीजनचा पुरवठा उपलब्ध आहे.