ह.भ.प.शिवराम मारकड बाबा यांचे नाव घेतले की, सर्वांच्या कायम स्मरणात राहील, ते त्यांचे जीवनभरातील कार्य. सतत हसतमुख, विनोदी स्वभाव, सतत परोपकारी, धार्मिक आणि विधायक कामाचा ओढा असलेला पिंड, आणि कार्यमग्न हे मारकड बाबा यांचे वैशिष्ट होते.
शिरूर (कासार) तालुक्यातील तरडगव्हाण येथे 23 मार्च 1942 मध्ये जन्मलेल्या शिवराम मारकड बाबा यांचा तसा सामान्य शेतकरी कुटूंबाचा वारसा. आई लहानपणीच वारल्यामुळे त्यांचा सांभाळ गयानानी आघाव नातेवाईकांनी केला. वडिल कान्होजी मारकड हे खंडोबाचे भक्त आणि वाघ्या म्हणून परिसरातच नव्हे तर बीड जिल्हयात प्रसिध्द होते. प्रतिकुल परिस्थिती आणि शिक्षणाच्या सोयी-सुविधा नसताना त्यांनी शिवरामबाबा मारकड यांना शाळेत घातले. प्राथमिक शिक्षणानंतर बीड येथे पाठविले. त्याकाळात नावलौकिक असलेले दिवंगत अॅड.दिनकरराव राख यांच्याकडे राहिले. तर वसतीगृहात काहीं दिवस राहून शिक्षण घेतले. अपरी मेहनत आणि कष्टातून पदवी प्राप्त केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात काही दिवस मारकडबाबा यांनी बीड येथील बलभीम महाविद्यालयात ग्रंथालयात काम केले. राजकारण, समाजकारण याबरोबरच शिक्षणाचे मोठे महत्व ओळखून लोकनेत्या स्व.केशरकाकू क्षीरसागर यांनी बीड येथे नवगण महाविद्यालय सुरू केले. त्यावेळी दिवंगत सोनाजीराव नाना क्षीरसागर आणि स्व. केशर काकूंनी नवगण महाविद्यालयात मारकड बाबा यांना नोकरीसाठी पाचारण केले. बलभीम महाविद्यालयातील नोकरी सोडून ते नवगण महाविद्यालयात रूजू झाले. सेवानिवृत्तीपर्यंत त्यांनी प्रामाणिकपणे सेवा केली. ग्रामीण भागातील लाखो मुलांना ग्रंथालयाच्या माध्यमातून पुस्तके देवून सातत्याने मार्गदर्शक केले. काही वर्षे रात्रीचे रात्रीचे ग्रंथालय सुरू करून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ग्रंथाचे दालन खुले करून दिले. सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी कुटूंबाकडेही लक्ष दिले.
शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबरोबच ह.भ.प.मारकड बाबा यांनी धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले. त्यांना संतश्रेष्ठ भगवानबाबा, वै.वामनभाऊ महाराज, वै.ह.भ.प. भिमसिंह महाराज, वै. ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर, वै.गणेशानंद सरस्वतीजी महाराज, गणेशानंदगड, वै.खंडुजीबाबा महाराज यांचा त्यांना सहवास लाभला होता. संत सहवासामुळे भजन, प्रवचन, व्याख्यान आणि कीर्तनाच्या माध्यमातून ते समाज प्रबोधन करत. बीड येथील आमराई भागात संतश्रेष्ठ भगवानबाबा यांचा सप्ताह 30 वर्षापूर्वी सुरू केला. बीड येथील श्रीसंत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठानच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. भगवानबाबा प्रतिष्ठानचे ते तहयात कोषाध्यक्ष होते. सेवानिवृत्तीनंतर भगवानबाबा प्रतिष्ठानच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले होते. संतश्रेष्ठ भगवानबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने बीड येथून जाणार्या दिंडीच्या राहाण्याची व भोजनाची ते सोय करत.
जिद्द, मेहनत, कष्ट घेतल्यास जीवनात यश, कीर्ती, ऐश्वर्य आणि संपत्ती मिळते, असे ते कीर्तनाच्या माध्यमातून सांगत. बोले तैसे चाले, त्यांची वंदावी पाऊले, या उक्तीप्रमाणे मारकड बाबा यांचे कार्य होते. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण श्रध्दांजली.
नारायण नागरे, बीड. 9422744401