विनायक मेटेंचा खळबळजनक आरोप: मंत्रिमंडळात राहून महाराष्ट्र पेटवणे परवडणार का?

जालना, 26 डिसेंबर : ‘मराठा आणि कुणबी एकच असून मराठा(maratha) समाजावर अत्यंत चुकीचे आणि बालिशपणाचे आरोप केले जात आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे(Gopinath munde) साहेबांच्या जागी ओबीसी समाजाचा नेता बनण्यासाठी चढाओढ लागल्यामुळेच मराठा-ओबीसी वाद पेटविण्याचं काम केलं जात आहे. मंत्रिमंडळात राहून महाराष्ट्र पेटविणे राज्याला परवडणार का?’ असा खोचक सवाल उपस्थित करत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे(Vinayak mete) यांनी काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांचं नाव न घेता हल्लाबोल केला आहे.

मराठा समाजाला EWS आरक्षण देण्याच्या निर्णयावरून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत आता विनायक मेटे यांनीही उडी घेतली आहे. मेटे यांनी एकीकडे राज्य सरकारवर ताशेरे ओढले तर दुसरीकडे EWS चं समर्थनही केलं आहे.

विनायक मेटे म्हणाले की, मराठ्यांच्या SEBC आरक्षणावर स्थिगिती असून येत्या 24 तारखेपासून न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे. ही सुनावणी किती दिवस चालेल, काय चालेल काही माहीत नाही. तोपर्यंत राज्य सरकारने मोठी नोकरभरतीची घाई लावली आहे. या नोकरभरतीत खुल्या प्रवर्गासाठी 10 टक्के आरक्षण असून मराठा समाजाच्या मुलांना पण त्याचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून ESW चा आमचा आग्रह होता. मात्र त्याबाबत सरकार लवकर निर्णय घेत नव्हतं. शेवटी उच्च न्यायालयाने कानफटात लावल्यानंतर सरकारने निर्णय घेतला आहे,’ असा हल्लाबोल मेटे यांनी केला आहे.

‘अनेकांनी शंका उपस्थित केली आहे की EWS मुळे SEBC आरक्षणाच्या सुनावणीवर काही परिणाम होणार का? परंतु असं अजिबात नाही. मराठ्यांना SEBC आरक्षण मिळाल्यास ऑटोमॅटिक EWS रद्द होईल. पण सरकारने पारदर्शकपणे या शंकांचे निरासरण केलं पाहिजे,’ असा सल्ला देत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले मात्र EWS आरक्षणाच्या निर्णयाचं समर्थनही केलं आहे.

error: Content is protected !!