नागपूर: सध्या कॉंग्रेसला अध्यक्षच सापडत नाही. त्यामुळे शरद पवारांना कॉंग्रेसचे अध्यक्ष करावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. यासोबतच पवार जर एनडीएमध्ये आल्यास मोदींचे हात आणखी बळकट होतील, अशी मुक्ताफळेही आठवले यांनी उधळली. राहुल गांधी हे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यास आम्हालाच फायद्याचे आहे. त्यांच्यामुळे आम्हाला चांगली संधी असते.
हे वाचा : ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार: देवेंद्र फडणवीस
करोना काळात मृत्यू झालेल्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटी व एका पुस्तक प्रकाशनप्रसंगी नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ‘पवार यांना कॉंग्रेस पक्षाने अपमानास्पद वागणूक दिली. त्यांना पंतप्रधान होण्याची संधी असतानाही डावलले. संसदीय बोर्डाच्या बैठकीतही त्यांच्याशी योग्यपध्दतीने वागत नव्हते. दस्तुरखुद्द सोनीया गांधी यांनीही त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. पवार यांच्यावर काँग्रेसमध्ये असताना अन्याय झाला. आता हा अन्याय दूर करण्याची संधी काँग्रेसजवळ आहे. त्यामुळे त्यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष केल्यास काय हरकत आहे, असा टोला आठवले यांनी लगावला.