मुंबईः बिहार विधानसभा निवडणुकीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आक्षेप घेतल्यानंतर, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला आहे. सतत पवारांसोबत राहून राऊतांना कोलांट्या मारण्याची सवय झाली आहे, अशी खोचक टीका भातखळकर यांनी केली आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यावरूनच संजय राऊत यांनी बिहारमध्ये करोना संपला का? असा सवाल केला आहे. करोनाच्या भीतीने विधिमंडळ आणि संसदेलाही अधिवेशन गुंडाळावे लागले आहे. करोनाने आतापर्यंत एक मंत्री आणि तीन खासदारांना प्राणास मुकावे लागले आहे. इतकी भीषण स्थिती असतानाही बिहारमध्ये विधानसभा निवडणुका का घेतल्या जात आहेत?, बिहारमध्ये करोना संपला आहे का? असं संजय राऊत म्हणाले होते. यावरून भाजप नेत्यांनी संजय राऊत यांना घेरलं आहे.
‘सतत पवारांसोबत राहून राऊतांना ही कोलांड्या मारण्याची सवय झाली आहे, करोनाच्या काळात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीवर त्यांनी तीर चालवले आहेत. मुख्यमंत्र्यांची खुर्ची पक्की करणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका करोनाच्या काळातच झाल्या होत्या याचा त्यांना विसर पडलेला दिसत,’ असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. तसं ट्विट त्यांनी केलं आहे.