कृषी विधेयकं दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाल्यानंतर हरियाणा, पंजाब या भागांमध्ये आंदोलनांनी डोकं वर काढलं. काही शेतकरी संघटनांनीही असाच सूर आळवला. ही परिस्थिती पाहता खुद्द पंतप्रधानांनी एक ट्विट करत बळीराजाला हमी देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच ट्विटचा आधार घेत बी- टाऊनच्या क्वीननं तिचं मतही मांडलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ट्विटचा आधार घेत कंगनानं तिची भूमिका स्पष्ट केली. कृषी विधेयकानंतर मोदींनी शेतकऱ्यांना उद्देशून एक ट्विट केलं. ज्यामध्ये त्यांनी आपलं सकरार हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असल्याची बाब स्पष्ट केली. ‘मी यापूर्वीही सांगितलं आहे आणि आता पुन्हा सांगत आहे. एमएसपीची व्यवस्था यापुढेही सुरु राहिल. शेतमालाची खरेदी सरकार करणार आहे. आम्ही इथं शेतकऱ्यांच्या सेवेसाठीच आहोत. अन्नदाता असणाऱ्या बळीराज्याच्या सेवेसाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या भावी पिढीसाठी समृद्ध जीवनाची शाश्वतीही देणार आहोत’, असं मोदींनी ट्विट करत लिहिलं.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, जो झोपी गेला आहे त्याला जागवता येऊ शकतं. ज्याला गैरसमज आहेत ते दूरही करता येऊ शकतात, त्यांची समजूत काढता येऊ शकते. पण, झोपण्याचं आणि काहीही न समजल्याचा अभिनय कोणी करत असेल तर तसं सोंग कोणी घेत असेल त्यांना समजावण्यामुळं काय फरक पडणार आहे? CAA ला विरोध करणारे हे तेच दहशतवादी आहेत. CAA विरोधातील आंदोलनात रक्ताचे पाट वाहिले. पण, या कायद्यामुळं एकाही व्यक्तीचं नागरिकत्व हिरावलं गेलं नाही’, असं कंगनानं तिच्या ट्विटमध्ये लिहिलं.