बीजिंग: लडाखमधील उंचावरील भागात थंडीच्या दिवसात तापमान शून्य ते उणे २४ पर्यंत घसरते. त्याशिवाय श्वास घेण्यासही त्रास जाणवतो. थंडीची अजून सुरुवात झाली नसताना चिनी सैन्याला हवामानाचा त्रास होऊ लागला आहे. उंच ठिकाणी असलेल्या चिनी सैनिकांना हवामानाचा त्रास जाणवू लागला आहे. पॅन्गाँग सरोवर परिसरात भारत-चीन दरम्यान तणाव कायम आहे. काही आठवड्यांपूर्वी या भागात घुसखोरी करून ताबा रेषा बदलण्याचा प्रयत्न चीनने केला होता. चीनच्या या आगळीकीला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत हा डाव हाणून पाडला. त्यानंतर भारतीय जवानांनी या भागातील काही महत्त्वाच्या उंच ठिकाणांचा ताबा घेतला. चीननेही काही उंचावरील भागांवर आपले सैन्य तैनात करत भारतावर दबाव बनवण्याचा प्रयत्न केला.
लडाखमधील थंडीच्या दिवसांत भारतीय जवानांचे हाल होतील अशी मल्लिनाथी चीनकडून करण्यात येत होती. लडाखमध्ये हिवाळ्याची चाहूल लागली असताना चिनी सैन्याचे हाल होण्यास सुरुवात झाली आहे. उंचावरील काही पोस्टमधून चिनी सैनिकांना स्ट्रेचरवरून रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त आहे.
पॅन्गाँग परिसरात फिंगर चारजवळील तापमान उणे ४ अंश सेल्सियस इतके कमी होऊ शकते. ऑक्टोबर महिन्यात सरोवर पूर्णपणे गोठते. लडाखजवळील देपसांग आणि दौलत बेग ओल्डी या भागातील तापमान उणे १४ अंश सेल्सियस इतके कमी झाले असून अजूनही पारा घसरण्याची शक्यता आहे. चिनी कॉम्बॅक्ट आरोग्यकर्मचारी उंचावरील ठिकाणांहून पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांना हटवत आहे. त्यांना स्ट्रेटरवरून घेऊन जाण्यात येत आहे. त्यांच्याऐवजी नवीन सैन्य तैनात करण्यात आले आहे. हवा आणि बर्फामुळे त्यांना त्रास जाणवत आहे. आता वाढत्या थंडीमुळे परिस्थिती आणखी कठीणच होणार आहे.
भारताने ६७०० मीटर उंच असलेल्या सियाचीन ग्लोशियरमध्ये १९८४मध्ये लष्करी कारवाई केली आहे. सियाचीन ही जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी आहे. भारतानेदेखील लडाखमधील परिस्थिती पाहता वैद्यकीय तयारी पूर्ण केली आहे. चीन अधिकाऱ्यांनी, माध्यमांनी भारतीय सैन्य थंडीच्या दिवसात पॅन्गाँग आणि लडाखमधील उंच भागात जास्त दिवस राहू शकत नाहीत असे म्हटले होते. मात्र, परिस्थिती याउलट असल्याचे दिसत असून थंडीची अजून सुरुवात झाली नसतानाही चीनच्या सैन्याला हवामानाचा त्रास जाणवू लागला आहे.