बायकोवर गंभीर वार करत सुनेचा मुडदा पाडला

माणूस पैशाने कितीही श्रीमंत असला तरी त्याला त्याच्या कुटुंबीयांकडून मिळणार्‍या सुखाशीवाय तो कधीच समाधानी होवू शकत नाही. आयुष्यभर काबाडकष्ट करत पोटाला चिमटा देवून सांभाळलेल्या पोटच्या पोराने त्याच लग्न झाल्यानंतर धासफूस सुरु केल्याने आई-वडिलांसाठी त्यापेक्षा दुसरी वाईट गोष्टच असू शकत नाही. उतरत्या वयात मुलांचा आधार मिळण्याएैवजी घरात धासफूस होत असेल तर माणूस आतल्या आता कुजतो. त्यात आता आता छोटे कुटुंब पध्दत आली आहे. सासू-सासर्‍याला धुसफुस केल्यानंतर तेचं स्वत: आपली चूल बाजूला मांडतात म्हणून काही मुली त्याचाही प्रयत्न करतात. उतरत्या वयात माणसाला मुलाबाळांचा सुखी संसार बघायचा असतो. त्यांचे मुलं स्वत:च्या अंगाखांद्यावर खेळवायची असतात. मात्र सुनेच्या एकलखोर्‍यापणामुळे म्हणा की पोराच्या. अनेक जण त्या सुखापासून वंचित राहतात. आत्मीक समाधान न मिळाल्यामुळे माणूस कुठल्याही थराला जावू शकतो अन् नको त्या घटना घडतात. अशीच एक थरारक घटना बर्दापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून सुडाने पेटलेल्या सासर्‍याने बायकोच्या पाटीत कुर्‍हाडीचे घाव घालत जिवे मारण्याचा प्रयत्न केला तर सुनेचा जागेवरच मुडदा पाडला.

बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी बीड जिल्ह्यातील पाच ते सात एक्करचा मालक देखील पश्चिम महाराष्ट्रासह परराज्यात ऊस तोडणीसाठी जातो. त्यात इथल्या दळभद्री पुढार्‍यांनी जिल्ह्यात आतापर्यंत एकही असा प्रकल्प आणलेला नाही की ज्यामुळे इथल्या युवकांना इथेच रोजगार मिळेल इथे बेरोजगारांच्या हाताला काम नसल्याने ते कामाच्या शोधात मेट्रो सिटी गाठतात तिथे गेल्यानंतर तिथले वातावरण मोठ मोठ्या इमारती… रस्त्याच्या कडेला छोटे छोटे कपडे घालून बसलेले जोडपे… गळ्यात गळा घालून फिरणारी तरुण पोरा पोरी… हे दृश्य पाहून आपणही असच जगावं हे स्वप्न खेड्याकडील मुलं उघड्या डोळ्यांनी पाहतात. असाच कामाच्या शोधात बीड जिल्ह्यातील बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पट्टीवडगाव येथील अजय बालाजी लव्हारे नावाचा युवक पुणे येथे गेला.

तेथे त्याने कामही शोधले ते काम करू लागला. त्यानंतर बाहेरच आयुष्य पाहून तोही तसाच जगण्याची स्वप्न पाहू लागला अशातच त्याच्या संपर्कात एक देखणी तरुणी आली ती दिसायला सुंदर असल्यामुळे तो तिच्या प्रेमात पडला. हळूहळू भेटीगाठी वाढल्या दोघांची चांगली मैत्री झाली ती ही बीड जिल्ह्यातील असल्याने त्यांची रोज भेट होऊ लागली तिचा हळूहळू अजयमध्ये जिव जडला. त्यानंतर दोघांनीही सिर्फ तुम म्हणत घरच्यांचा विरोध झुगारुन सात जन्माच्या गाठी बांधण्याचे ठरवले अन् पुणे येथे विवाह केला. हा विवाह अजयच्या वडिलांना मान्य नसल्याने त्यांनी त्याला विरोध दर्शवला होता. लग्न झाल्यानंतरच काही दिवसातच अजयची पत्नी शितल आणि तो पट्टीवडगाव येथे आले. मात्र हा दोघांचा विवाह अजयचे वडील शितल चे सासरे बालाजी संभाजी लव्हारे यांना मान्य नव्हता. मात्र एका वर्षानंतर अजयच्या वडीलांनी मनातला राग बाजूला ठेवला अन् ते परराज्यात कामानिमित्त गेले (ते खाजगी वाहनावर चालक असून पोटाची खळगी भरण्यासाठी तेही परराज्यात जातात वर्षानुर्षे तिकडेच राहतात.) या घटनेला चार वर्ष होऊन गेले दरम्यान शितल आणि अजय यांनी सुखी संसाराचे स्वप्न रंगवत वैवाहिक जीवनाचा आनंद घेतला.

त्यांच्या संसाराच्या वेलीवर एक फुल उमललं. रसर्वकाही सुरळीत होतं मात्र जेव्हापासून अजय आणि त्याची पत्नी हे पुण्यावरून गावी आले तेव्हापासून अजय कसलेच काम करत नव्हता असे त्याचे वडील बालाजी लव्हारे यांचे म्हणने होते. व लव्हारे याचे संपूर्णच कुटुंब बसून खात असल्याचेही त्याची तक्रार असायची. यातच करोना सारख्या महामारी ने जगाला थांबवलं अनेकांचा रोजगार गेला तसा बालाजी लव्हारे यांचाही रोजगार गेला. त्यामुळे गेल्या पाच महिन्यापूर्वी बालाजी लव्हारे हे त्यांच्या मूळ गावी बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पट्टी आडगाव येथे आले. बालाजी लव्हारे हे गावी आल्यानंतर त्यांना वेगळे चित्र पाहायला मिळाले. घरात स्वतःची पत्नी मुलगा सून त्यांना व्यवस्थित बोलत नव्हत्या तर त्यांच्या दोन पोटच्या मुली बालाजी लव्हारे यांना बोलल्या की, त्यांची आई त्यांना बोलत असे. बालाजी लव्हारे काबाडकष्ट करून घरात संसारोपयोगी वस्तू आणायचे मात्र सर्वजण त्यांनाच धासफुस करायचे पोलिसांच्या म्हणण्यानुसार बालाजी लव्हारे यांनी सांगितल्यावरून सर्वजण माझ्या जीवावर बसून खातात आणि मलाच धासफुस करतात त्यामुळे बालाजी लव्हारे यांना हा अपमान सहन झाला नाही. ते सुनेला तु काम का करत नाहीस असे म्हटले तर ती त्यांना उलट बोलायची त्यामुळे बालाजी लव्हारे यांचा पारा चढायचा आणि रोजच किरकोळ कारणावरुन घरामध्ये भांडस सुरु व्हायचे.

मात्र हे किरकोळ भांडण जरी असले तरी बालाजी लव्हारे यांच्या डोक्यात भलतं सलतं आलं होतं आणि त्यांनी चक्क सून बायको त्यांना ठार मारण्याचा आणि मुलाचे पाय तोडण्याचा कटच रचला या कटासाठी त्यांनी एक महिना घेतला. वार आणि वेळ निश्चित केला. त्या एका महिन्यात ते कोयता आणि कुर्‍हाड स्वतःच्या जवळ घेऊन झोपत असत त्यावेळी त्यांच्या दोन मुली बाबा आम्हाला त्यामुळे भीती वाटते असे का वागत आहात तर ते मुलीला म्हणायचे मला स्वप्न पडतात त्यामुळे मी कुर्‍हाड आणि कोयता सोबत घेऊन झोपतो. बालाजी लव्हारे वाट पाहू बसलेला तो दिवस २७ ऑगस्ट चा उजाडला आणि आज या दोघींचा खात्मा करायचा त्यांनी ठरवले (२७ ऑगस्ट हा दिवस निवडण्याचे कारण या दिवशी लक्ष्मीचा सण त्यामुळे तिघेही एकाच वेळी घरी भेटणार) ते मोक्याची वाट पाहत होते त्यांना तिघेही एकाच वेळी मारायचे होते. त्यामुळे दिवसभर तिघे केव्हा घरी येतात याची ते वाट पाहत होते मात्र बाहेर गेलेला मुलगा परत येत नव्हता. रात्र होत होती. त्यावेळी अजय हा बाहेरून आला मात्र तो खिडकीतूनच पत्नीला आवाज देत पत्नीच्या हातात पार्सल देऊन मी मित्रांसोबत जेवायला जात आहे तू हे पार्सल खा असे म्हणून अजय निघून गेला.

शितल आपल्या माहेरी आईला फोनवर बोलत होती ती सहा महिन्याची गरोदर असल्याने आई तिला काळजी घे म्हणून फोन करत असे. बालाजी यांची पत्नी आपल्या खोलीमध्ये लक्ष्मी बसवल्या आहेत त्या घरात बसलेली होती. त्याच खोलीत शीतलची दोन वर्षाची मुलगी झोपलेली होती. हा मोका पाहून विजयने पत्नीच्या पाटीत दोन कुर्‍हाडीचे घाव घातले. त्या दोन घावात पत्नी जागेवर कोसळली यावेळी बालाजी यांची लहान मुलगी बाबा नका मारू म्हणून विनवणी करत होती. मात्र सैतान अंगात शिरलेल्या बापाला काहीच ऐकू येत नव्हतं गंभीर जखमी झालेली त्याची पत्नी कशीबशी उठून ओरडत बाहेर पळाली. बाहेर पडवीत माहेरी बोलत असलेल्या शीतलला सासूच्या पाटील घाव पाहून काय घडले याचा अंदाज आला होता. सासू घरा बाहेर पळाली तशी सून शीतल देखील स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडली असती तर तिचा जीव वाचला असता. मात्र सासर्‍याने सासूवर ज्या खोलीत वार केले त्याच खोलीत तिची चिमुकली झोपलेली होती. तिलाही सासरा मारेल या भीतीपोटी शितल कसलाही विचार न करता त्या खोलीत शिरली. तशी आरोपीने दरवाजाची कडी लावत मागचा पुढचा विचार न करता थेट शितलीच्या मानेवर दोन वार करत शीतलता मुडदा पाडला. आणि मुलाचे पाय तोडण्यासाठी घराबाहेर पडला. पत्नी दारात दिसली नाही त्यामुळे तो कुर्‍हाड हातात घेऊन पत्नीचा शोध घेऊ लागला मात्र ती एका दुसर्‍या व्यक्तीच्या घरात गेल्याने त्याला दिसली नाही तर मुलगा बाहेर गेल्याने तो वाचला. दरम्यान शितलवर जेव्हा वार केले तेव्हा ती आईला फोनवर बोलत होती. त्यावेळी शीतल मोठ्याने ओरडण्याचा आवाज आल्यानंतर काहीतरी भलतं सलतं झाल असल्याचं तिच्या लक्षात आले.

त्यानंतर शीतलचा मोबाईल घेऊन आरोपीने तिच्या माहेरी फोन करून तुमच्या पोरीला मी जिवंत मारले आहे असे म्हणून फोन कट केला. व शितलचा फोन घेवून निघून गेला. त्यानंतर शितलच्या आईने तिचे जावई यांना फोन करून घरी काय घडले हे विचारले असता मी बाहेर आलेलो आहे मला काहीच माहित नाही असे सांगितले. त्यानंतर अजय घरी परतला तर आई व पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यानंतर तात्काळ दोघींनाही घाटनांदुर येथील दवाखान्यात नेले डॉक्टरांनी शीतलला आतापासून मयत घोषित केले तर आईला पुढील उपचारासाठी अंबाजोगाईला पाठवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अजय ने आईला अंबाजोगाईच्या रुग्णालय दाखल केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळतात घटनास्थळी पोलिस ठाण्याचे प्रमुख सपोनि शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मुळे, भक्तराम गीते, मच्छिंद्र खाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर शितलचे वडील किसन शेषराव कराड राहणार वाका तालुका परळी यांच्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी संभाजी लव्हारे यांच्या विरोधात कलम ३०७, ३०२ नुसार बर्दापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आरोपी ताब्यात घेणे पोलिसांचे पहिले काम होते. त्या दिशेने पोलीस आरोपीच्या मार्गावर केले. आरोपी पंधरा ते वीस किलोमीटर शेतामध्ये चालत घाटनांदुरला गेला आणि रोडच्या साईडला असलेल्या खड्‌ड्यात जाऊन बसला पोलिसांची गाडी आली की तो दडून बसायचा आणि गाडी गेली की पुन्हा चालायचा त्यानंतर तो घाटनांदुर च्या जुन्या बस स्टॅन्ड मध्ये बसला.

आरोपीने एक शक्कल लढवत स्वतःचा मोबाईल घटनास्थळी टाकत सुनेचा मोबाईल जवळ घेतला मात्र सुनेचा मोबाईल अँड्रॉइड असल्याने त्याला त्याच्यावरून फोन करता आला नाही. मात्र त्या मोबाईलवर पोलिसांसह अन्य लोक फोन करू लागल्याने आरोपीने तो मोबाईल फोडून टाकून दिला. आणि आरोपीच्या मनात काहूर उठले. आपण बायको आणि सून जिवंत मारली. आता पुढे काय करायचे स्वतःफाशी घेऊन जीव द्यायचा, पोलिसांच्या स्वाधीन व्हायचे की परराज्यात निघून जायचे या विचारात बस स्थानकात बसलेला होता याच विचारात त्याला स्थानकातच झोप लागली. संध्याकाळचे साडेपाच वाजून गेले होते त्यानंतर आरोपीने बर्दापूरला जाण्यासाठी पाचशे रुपये देऊन एक रिक्षा केला. मात्र पोलिसांनी आरोपीच्याशोधासाठी गुप्त यंत्रणा कामाला लावली होते. रिक्षा केल्याचे पोलिसांच्या कानावर आले अन् पोलिसांनी तत्काळ बसस्थानकात धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. २८ ऑगस्टला कोर्टात हजर केले कोर्टाने आरोपीला चार दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली. त्यानंतर ज्या कुर्‍हाडीने खून केला की कुर्‍हाड आरोपीने पट्टीआडगाव शिवारात एका सोयाबीनच्या शेतात टाकली होती ती पोलिसांनी ताब्यात घेतली. न्यायालयात हजर केले असता २ सप्टेंबर पासून आरोपीला न्यायालनी कोठडी सूनावण्यात आलेली आहे. या घटनेचा तपास पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे, स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली बर्दापूर पोलिस ठाण्याचे सपोनी रविंद्र शिंदे यांनी केला. त्यांना पोलीस हेडकॉन्स्टेबल बालासाहेब मुळे, भक्तराम गीते, मच्छिंद्र खाडे यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!