सरकारने ठरवून दिलेलया दरांबाबत डॉक्टरांचा संघर्ष…

जनतेची लूट थांबवण्यासाठी करोना रुग्णालयांचे दर सरकारने ठरवले आहेत. मात्र, त्याचा आर्थिक फटका आता छोट्या रुग्णालयांना बसू लागला आहे.
करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर सरकारने डॉक्टरांना विश्वासात न घेता करोना रुग्णालयांचे दर दडपशाही करून ठरवले आहेत. परिणामी छोटी रुग्णालये बंद पडण्याची वेळ आली आहे. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) याबाबत १ सप्टेंबरला झालेल्या बैठकीचे स्मरण देऊन तीन दिवसांत फेरचर्चा करण्याची विनंती केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सरकारच्या निर्णयाविरोधात संघटनेच्या राज्यातील २१६ शाखांमधील ४५ हजार डॉक्टरांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.

जनतेची लूट थांबवण्यासाठी करोना रुग्णालयांचे दर सरकारने ठरवले आहेत. मात्र, त्याचा आर्थिक फटका आता छोट्या रुग्णालयांना बसू लागला आहे.

खर्च निघणे झाले अवघड..

साथीच्या नियंत्रणासाठी डॉक्टरांचा सल्ला न घेता प्रशासकांकडे जबाबदारी सोपवण्यात आल्याने अनेक ठिकाणी अपयश येत आहे. ते लपवण्यासाठी खासगी डॉक्टरांवर चिखलफेक करण्यात येत आहे. ‘आयसीयू’साठी ठरवलेल्या दरांमध्ये ऑक्सिजन, पीपीई किट्स, बायोमेडिकल वेस्ट चार्जेस, कर्मचाऱ्यांचे पगार, निर्जंतुकीकरणाचा खर्च भागवणे रुग्णालयांसाठी अवघड होत आहे. त्यामुळे राज्यातील २५ हजारपैकी बहुसंख्य रुग्णालये बंद पडण्याची वेळ आली आहे. आरोग्यमंत्र्यांनी ३१ ऑगस्टपूर्वी बैठक घेऊन दर निश्चित करण्याचे ठरले होते. मात्र आरोग्य सचिवांनी ३१ ऑगस्टला परिपत्रक काढून दर कायम ठेवले. हे परिपत्रक अमान्य करत ते फेटाळण्याचा निर्णय ‘आयएमए’ने घेतला आहे. त्यानुसार सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र संघर्ष करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

करोनारुग्णांवर उपचार करताना मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांच्या स्मरणार्थ ९ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता डॉक्टर रुग्णालयांसमोर येऊन १० मिनिटे मूक श्रद्धांजली, तर रात्री ८ वाजता दीप श्रद्धांजली वाहणार आहेत. १० सप्टेंबरला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर शांततामय निदर्शने करण्याबरोबरच आझाद मैदान येथे शांततेत महारॅली काढण्यात येणार आहे. ‘आयएमए’च्या सर्व शाखा या दिवशी सकाळी ११ वाजता मेडिकल काऊन्सिलच्या रजिस्ट्रेशनच्या प्रतिकृतींची होळी करतील, असे ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले. राज्यातील अनेक नेते व सरकारी अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे स्वतःला सेल्फ क्वारंटाइन करून घेतले आहे, त्याचप्रमाणे डॉक्टरांनीसुद्धा आता सामुदायिकरित्या सेल्फ क्वारंटाइन करून घेण्याची वेळ आली आहे. या विलगीकरणाची मुदत १४ दिवसांपर्यंत असू शकेल, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!