राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या विरोधकांना शिवसेनेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून सडेतोड उत्तर दिलंय. राज्यातील पोलीस दलात ठाकरे सरकारने नुकतेच मोठे फेरबदल केले आहेत. त्यावरून विरोधकांनी टीका सुरू केली आहे. ‘सरकारला बदल्यांशिवाय दुसरे काहीच काम नाही. बदल्यांचे दुकान उघडले आहे. बदल्यांमागचा हिशेबच जाहीर करण्याचा इशाराही विरोधकांनी दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र दैनिक (Saamana) च्या अग्रलेखातून विरोधकांच्या या आरोपांचा समाचार घेण्यात आला आहे.
हे पण वाचा – आदित्य ठाकरेंचीही ड्रग टेस्ट करा; ‘या’ नेत्याची मागणी
बदली झालेले बहुतेक अधिकारी फडणवीस सरकारच्या काळात नेमलेले होते. या अधिकाऱ्यांना तत्काळ बदलावे अशी जोरात मागणी असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सात-आठ महिने कोणत्याही प्रमुख अधिकाऱ्यास हात लावला नाही. कोविड काळात याच अधिकाऱ्यांच्या मदतीने मुख्यमंत्र्यांनी संकटाचा सामना केला. प्रशासन हे लोकनियुक्त सरकारचे असते. एखाद्या राजकीय पक्षाचे ते नसते. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनावर विश्वास ठेवला. पहिल्या महिन्यातच त्यांना बदल्या करता आल्या असत्या, पण त्या केल्या नाहीत. बदल्यांच्या दुकानदारीची प्रथा सरकारला पाडायची नसावी,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.
‘गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात अशा नेत्यांनी एकत्र बसून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे पत्ते पिसले आहेत हे स्पष्ट दिसते. कोणत्याही कुरबुरी न होता हे बदल झाले. मर्जीतले अधिकारी त्यांनी त्यांच्या काळात नेमले. आता कर्तबगारी, राज्याची गरज पाहून नेमणुका झाल्या,’ असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.