एकनाथ खडसे संपले असे कालपर्यंत अनेक लोक म्हणत होते. पण, नाथाभाऊंनी आता एकच प्रकरण बाहेर काढले तर महाराष्ट्र हादरला. हे तर पहिलेच प्रकरण आहे, अजून कितीतरी प्रकरणे बाकी आहेत. मोठी राजकीय गँग पहिल्या प्रकरणात अडकली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाचाही यामध्ये समावेश नसल्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नसल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
हे वाचा : उर्मिला मातोंडकर यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश
राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विधानपरिषदेतील आमदारकीविषयी विचारणा करण्यात आली असता, या नाथाभाऊंना पवार साहेबांनी आमदार करायचे ठरवले तर इतरांच्या मतांची मला गरज पडणार नसल्याचे वक्तव्य यांनी केले. त्यामुळे विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटी रूपयांच्या घोटाळ्यांवरून मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील काही बड्या नेत्यांची नावे या घोटाळ्यात आहेत. त्यांची यादीच तयार केल्याचा गौप्यस्फोट करतानाच त्यांच्यावर ‘ईडी’ने कारवाई करावी असेच हे प्रकरण असून या घोटाळ्याप्रकरणी येत्या दोन दिवसात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.
मी संकट मोचक नसून अडचणीतून मार्ग काढणारा मी असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. मी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे आता खाल्ल्या मिठाला जागले पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच कार्यकर्त्यांनी दणक्यात पवारांचा वाढदिवस साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.