राज ठाकरेंनी दिले ‘हे’ आदेश; मनसे उतरणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत

नगर: राज्यातील सर्व म्हणजे चौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा आदेश पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. तसे पत्र पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना पाठविले आहे. गेल्यावेळी लोकसभा निवडणूक न लढविता ‘लाव रे तो व्हिडिओ’ सभा गाजविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता थेट ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये उतरण्याचे ठरवले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मनसेने आपल्या धोरणांत अमुलाग्र बदल केले आहेत. शक्य ते शिवसेनेची कोंडी करण्याचा पक्षाचे प्रयत्न दिसून येतात. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाने आता ग्रामीण भागातही लक्ष देण्यास सुरवात केल्याचे दिसून येते. राज्यातील सुमारे चौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. वास्तविक पहाता ग्रामपंचायत निवडणुका तांत्रिकदृष्या पक्षीय पातळीवर लढल्या जात नाहीत. त्यामध्ये पक्षाचे चिन्ह नसते. तरीही विविध पक्षांचे म्हणून पॅनल तेथे तयार केले जातात. एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या ग्रामीण भागात अलीकडेच भाजपचाही शिरकाव झाला आहे. यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून एकत्रित निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बैठकीत तसे जाहीरही केले होते. त्यामुळे बहुतांश गावांत महाविकास विकास आघाडी विरूद्ध भाजप अशी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अशातच आता मनसेनेही या निवडणुकीत उडी घेतली आहे. नांदगावकर यांनी पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होत आहे. या निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करून त्यांना संपूर्ण ताकदीने निवडून आणावेत, असा आदेश पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यानुसार जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांनी आपल्या भागातील ग्रामपंचायतींमध्ये पक्षाचे उमेदवार उभे करावेत. त्यांच्या याद्या पक्षाच्या मुख्यालयात पाठविण्यात याव्यात, असे नांदगावकर यांनी पत्रात म्हटले आहे.

यावरून आता शिवसेनेपाठोपाठ मनसेनेही ग्रामीण राजकारणात लक्ष घालण्याचे ठरविले असल्याचे दिसून येते. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत यावेळी चांगलेच राजकीय रंग भरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असे या निवडणुकांकडे आतापर्यंत पाहिले जात असताना आता मनसेची एंट्री झाली आहे. अर्थात मनसेचे सध्याचे ग्रामीण भागातील अस्तित्व लक्षात घेतले तर त्यांना ही निवडणूक लढण्यासाठी केवळ बंडखोरांवरच अवलंबून राहावे लागण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!