शिवाजी महाराज आग्र्यावरुन लाच देऊन पळाले, राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. सोलापुरकर यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत म्हटले की, शिवाजी महाराजांच्या काळात पेटारे-बिटारे असा काहीच प्रकार नव्हता. त्यांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले होते. त्यांनी किती हुंडी वटवल्या, याचे पुरावे देखील असल्याचे सोलापुरकर यांनी सांगितले. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या वजीर आणि त्यांच्या बायकोलाही लाच दिल्याचे इतिहासात उल्लेख असल्याचे त्यांनी म्हटले.

सोलापुरकर यांच्या या वक्तव्यावरून अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोलापुरकर यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे. मिटकरी यांनी ट्विट करत म्हटले की, राहुल सोलापुरकर यांनी विकृत मानसिकतेतून इतिहासाची मोडतोड करून शिवरायांची बदनामी केली आहे. तसेच, मिटकरी यांनी या विधानाबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे. त्यांनी ट्विटमधून ही टीका करताना म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून स्वकर्तुत्वावर निसटले हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला आहे.

राहुल सोलापुरकर यांच्या या वादग्रस्त वक्तव्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी स्पष्ट केले की, पॉडकास्ट आधी ऐका आणि ज्याला त्यावर काय मत व्यक्त करायचे आहे ते व्यक्त करा. त्यांनी म्हटले की, त्यांना यात कोणत्याही वादात पडायचे नाही. त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत आणि हा वाद वाढतच चालला आहे.

error: Content is protected !!