आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे नाव घेतल्याने संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन वाद सुरू झाला होता. धस यांनी सांस्कृतिक परळी पॅटर्नचा दाखला देत नाव घेतल्यानंतर प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन, धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती. मात्र, धस यांनी माफी मागण्यास नकार दिला होता.
प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर धस यांनी दिलगिरी व्यक्त केली. धस यांनी म्हटले की, प्राजक्ता माळी यांचं जर मन दुखावलं असेल तर प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो. धस यांनी स्पष्ट केले की, प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता.
धस यांनी सांगितले की, भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांचा फोन आला नाही, केवळ चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बोलणं झालं. चुकलो किंवा नाही चुकलो तरीही तू क्षमा मागून टाक असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळे, एक मिनिटांत माफी मागतो असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली असल्याचंही धस यांनी म्हटलं. माझ्याकडून चुकलेलं काही नाही, तरीही मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही धस यांनी म्हटले.