बीड, दि. ९ (प्रतिनिधी): अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या हंगामी वसतिगृहातील १९ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
येल्डा येथे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृह आहे. यावर्षी काही दिवसांपूर्वीच हे वसतिगृह सुरू झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले. यात वांग्याची भाजी, भात, भाकरी असे पदार्थ होते. रात्री १२ च्या नंतर यापैकी काही विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. वसतिगृह कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले.
सध्या एकूण १९ विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.