बुलेट ट्रेनसाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या पण हक्काच्या पैशांवरच दलालांचा डोळा
वसई, 08 ऑगस्ट : पालघर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी बुलेट ट्रेन आणि बडोदा महामार्गासाठी घेण्यात आल्या आहेत. त्याबदल्यात सरकारनं शेतकऱ्यांना मोबदलाही दिला. मात्र, शेतकऱ्यांच्या मोबदल्यावर दलालांचा डोळा असल्याचं धक्कादायक वास्तव वसई तालुक्यात समोर आले आहे.
पैसे मिळवून देण्याचं आमिष देऊन दलालांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन दलालांकडून मोबदला मिळवून देण्याासाठी 15 टक्के रकमेची मागणी करण्यात येत आहे. शेतकरी आणि दलालाची ऑडिओ क्लीप व्हायरलं झाल्यानं खळबळ उडाली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आगरी सेनेनं आंदोलन केल्यानंतर त्यांना न्याय मिळाला आहे.
शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करूनही त्यांना मोबदल्यासाठी प्रांत कार्यालात हेलपाटे मारावे लागत होते. मात्र, तरीही त्यांना मोबदला मिळाला नव्हता. आगरी सेनेनं न्याय मिळवून दिल्याच्या भावना शेतकऱ्यांच्या आहेत.
वसईच्या प्रांताधिकारी स्वप्निल तांगडे यांना वर्षभरानंतर जाग आली आहे. कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका, असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशांसाठी वर्षभर प्रांताधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. यातून पाणी कुठे तरी मुरतंय असंच म्हणावं लागेल.