पदवीधर निवडणुकीत विरोधकाकडून जातीपातीचे राजकारण होत आहे, परंतु त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. ही निवडणूक क्रांतिकारी ठरणार असून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजपसह मित्रपक्षांचा विजय म्हणजे सरकार स्थापनेची मुहूर्तमेढ ठरणार आहे, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.(Marathwada Graduate Constituency election)
भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळातील विविध योजना, निर्णयाला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली. या सरकारला स्थगिती देऊन परत आम्ही येऊ, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी गुरुवारी परभणीत व्यक्त केला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, भाजप सरकारच्या काळात शेतकरी तसेच सामान्य नागरिकांच्या हिताचे विविध निर्णय घेण्यात आले. शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्यात आल्या. भाजपच्या काळातील विविध लोकहिताच्या योजना, निर्णयाला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली. गेल्या वर्षभरात या सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. या सरकारची तीन तिघाडा काम बिघाडा, अशी अवस्था झाली आहे. भाजपच्या सरकारने घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयास स्थगिती देणे हाच एककलमी कार्यक्रम या सरकारने गेल्या वर्षभरात राबवला असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. या वेळी आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे, मोहन फड, जिल्हाध्यक्ष सुभाष कदम आदींची उपस्थिती होती.