मुंबईः सुशांतसिंह राजपूत प्रकरणी पुन्हा एकदा राजकारण रंगू लागलं आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. एम्सच्या अहवालानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांवर हल्ला चढवला आहे. ‘भाजपनं हे प्रकरण हायजॅक केलं असून त्याला वेगळं वळण दिलं आहे,’ असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.
‘एम्सच्या अहलावानंतर महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं केला होता. तरीही, भाजपनं या प्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलं. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांनी जनता माफ करणार नाही.’ अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.
‘राज्याचं पाच वर्ष नेतृत्व करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला. गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्राची बदनामी केली. त्यासंदर्भात माझा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे की, ते गुप्तेश्वर पांडेच्या प्रचाराला जाणार का? ते आता निवडणूक लढवत आहेत, फडणवीस हे निवडणूक प्रभारी आहेत. फडणवीस हे या अधिकाऱ्याच्या निवडणूक प्रचाराला जाणार का?,’ असा सवाल देशमुखांनी उपस्थित केला आहे.
‘सुशांतप्रकरणाचं निमित्त पुढे करून एका राजकीय पक्षानं महाराष्ट्राला बदनाम करण्याच षडयंत्र रचलं आहे. बाहेरच्या राज्यातील कठपुतलींनाही आपल्या तालावर नाचवण्याचं काम या पक्षानं केलं. एम्स आणि कूपर रुग्णालयानं आपला अहवाल दिलाय. या अहवालातून सुशांतची हत्या झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याचबरोबर, सुशांतच्या शरीरात विष सापडलं नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं सीबीआयनंही आपला अहवाल द्यावा,’ अशी विनंती अनिल देशमुख यांनी केली आहे.