मुंबई -राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज नाही, अशा स्पष्ट शब्दात शरद पवार यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांना सुनावले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार नवनीत राणा तसेच इतर काही जणांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात राष्ट्पती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.
एकीकडे कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असतानाच सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, कंगना राणौत आणि शिवसेना वाद, तसेच नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला झालेला मारहाण यावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशी मागणी करणाऱ्यांना टोला लगावला आहे.
दरम्यान, राज्यसभेमध्ये कृषिविषयक विधेयक मांडण्यात आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सभागृहात उपस्थित नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र या प्रश्नावरून होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असेल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने संमत करून घेतलेल्या कृषिविषयक दोन विधेयकांविरोधात २५ सप्टेंबर रोजी देशव्यापी शेतकरी आंदोलन होणार आहे.