भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह त्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांना पत्रही लिहिलं आहे.
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू ( Yuvraj Singh) निवृत्तीचा विचार मागे घेण्याच्या तयारीत आहे. 2019मध्ये युवराजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह देशातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तो ग्लोबल ट्वेंटी-20 कॅनडा लीगमध्ये खेळला होता. आता तो पुन्हा (पंजाबकडून )ट्वेंटी-20 क्रिकेट खेळताना दिसू शकतो.
आंतरराष्ट्रीय कामगिरी
2012नंतर युवी भारतीय संघाचा नियमित सदस्य होता. त्यानंतर त्यानं तीन ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळले, परंतु वन डे वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्यात तो अपयशी ठरला. 2014-15च्या मोसमात युवीनं रणजी करंडक स्पर्धेत सलग तीन शतकं झळकावली, तरीही 2015च्या वन डे वर्ल्ड कपसाठीच्या संघात त्याचा विचार केला गेला नाही. 2017मध्ये त्यानं कमबॅक केलं, परंतु सात महिन्यांनंतर त्याला वगळले गेले. याकाळात त्यानं 11 वन डे व 3 ट्वेंटी-20 सामने खेळले. युवीनं 304 वनडे सामन्यांत 8701 धावा आणि 111 विकेट्स घेतल्या. 58 ट्वेंटी-20 सामन्यांत 1177 धावा आणि 28 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. त्यानं 40 कसोटी सामन्यांतही प्रतिनिधित्व केलं.
प्रस्तावाकडे दुर्लक्ष करु शकलो नाही : युवराज सिंह
‘क्रिकबझ’शी बोलताना युवराज म्हणाला की, “सुरुवातीला हा प्रस्ताव स्वीकारण्याबाबत मला खात्री नव्हती. मी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळणं बंद केलं होतं. मात्र जर मला बीसीसीआयकडून परवानगी मिळाली असती तर जगभरातील इतर प्रथम श्रेणी फ्रॅन्चायझी लीगमध्ये खेळणं मला सुरु ठेवायचं होतं. परंतु पुनीत बाली यांच्या प्रस्तावाकडे मला दुर्लक्ष करता आलं नाही. मी यावर फारच विचार केला, जवळपास तीन ते चार आठवडे. मला फार विचार करुन घेतलेल्या निर्णयाची गरज नव्हती हे अखेर माझ्या लक्षात आलं.”