मुंबई (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयात काल मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी झाली. कालच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयामध्ये मोठा निर्णय दिला आहे. सध्या नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा निर्णय देत न्यायालयाने आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. शिवाय, या खटल्याची सुनावणी मोठ्या खंठपीठासमोर करण्याचा निर्णयही दिला आहे. ”हा मराठा समाजातील मुलामुलींच्या भविष्याच्या दृष्टीने काळा दिवस आहे. हा काळा दिवस आणायचे काम ठाकरे – चव्हाणांच्या महाविकास आघाडी सरकारने आणायचे काम केले आहे. हि अतिशय निंदनीय, वाईट गोष्ट घडलेली आहे. आरक्षण टिकावे हे या आघाडी सरकारच्या मनातच नव्हते, त्यांची हि इच्छा पूर्ण झालेली आहे”. असा आरोप शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांनी केला आहे.
पुढे बोलताना आ विनायक मेटे म्हणाले कि, ”मी त्यांचा निषेध करतो आणि एक सांगतो कि, जर त्यांना मराठा समाजाच्या भवितव्याबाबत थोडे जरी प्रेम असेल तर उद्याची उद्या त्यांनी हे मराठा आरक्षण टिकवण्यासंदर्भात अध्यादेश काढावा व गरज लागली तर एक दिवसाचे अधिवेशन घ्यावे अन मराठा आरक्षण टिकवण्यासाठी भक्कम तयारी करावी”, अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. आ विनायक मेटे शेवटी म्हणाले कि, ”या मागणीची पूर्तता केली तरच मराठा समाज त्यांना माफ करू शकेल अन्यथा मराठा समाज त्यांना कदापि माफ करणार नाही”. मराठा आरक्षण नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी सध्या लागू करता येणार नाही यामुळे संपूर्ण मराठा समाजातून या घडलेल्या घटनेबाबत राज्य सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात येत असून समाजामध्ये महाविकास आघाडीबाबत संताप निर्माण झालेला आहे.